खेळ आणि सिनेमा
खेळाडूवर सिनेमा बनतो तेव्हा लाखो लोक ते पाहतात,
पण खऱ्या स्पर्धांबद्दल काय?
अलीकडच्या काळात खेळाडूंच्या आयुष्यावर सिनेमा बनण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अनेकांना अपरिचित असलेले खेळ आणि खेळाडू परिचयाचे होत आहेत व खेळाची संस्कृती रुजू होण्यास मदत होत आहे. खेळाचे जीवनात किती फायदे आहेत हे आता सर्वांना लक्षात येत आहे, त्यामुळे पूर्वी ज्याप्रमाणे खेळण्यास विरोध केला जायचा तो कमी होताना दिसतोय.
खेळ आणि खेळाडू म्हणल की जिंकण, फेम, पैसा, पदक, व्हिक्ट्री कप, प्रसिध्दी या गोष्टी सहज लक्षात येतात. पण खेळाडूच्या दृष्टीने पाहिलं तर कठोर परिश्रम, मेहनत, हार, सातत्य, जिद्द, दुखापत, जखम, चढ उतार, आर्थिक पाठबळाची कमतरता, प्रतिकूल परिस्थिती या गोष्टी आपल्याला लक्षात येतात.
व्यक्तितील एक चांगला गुण खेळासाठी पूरक ठरतो व त्यातून एका खेळाडूचा जन्म होतो. परिस्थिती प्रतिकूल असून सुद्धा मागे न हटण्याची वृत्ती त्याला पुढे घेऊन जाते. पुढे स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या कौशल्याची प्रात्यक्षिक सादर करण्याची कला आत्मसात करावी लागते. खेळाचे, संघटनेचे, शासनाचे व स्वतःचे नियम खेळाडू न कळतपणे खेळत असताना पाळतो. काही नियमांचा ताळमेळ जमला नाही, की तिथे संघर्ष सुरू होतो.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करावे आणि देशासाठी पदक मिळवून जगामध्ये आपल्या देशाचे नाव उंचवावे हे प्रत्येक खेळाडूच्या मनातील उत्कट इच्छा असते. त्यासाठी वाटेल तितका सराव करण्याची, मैदानावर रात्रंदिवस एक करण्याची, घर दार विसरून जाण्याची तयारी तो दाखवतो.
आता सिनेमाकडे वळूया, तस पाहायला गेलं तर भारतामध्ये तीन गोष्टी खूप चालतात. ते म्हणजे राजकारण, क्रिकेट आणि सिनेमा. बॉलिवुड, हॉलिवुड, तेलगू, मराठी वा इतर भाषेचे असो प्रेक्षकांची गर्दी सगळीकडे दिसते. खेळाडूंच्या जीवनावरील सिनेमा बनवणे हा नवा ट्रेंड पाहता ते पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी उल्लेखनीय आहे. तीन तासाच्या सिनेमा मध्ये खेळाडूने आयुष्यभरात किती व कशा पद्धतीने मेहनत घेतली आहे, किती प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले आणि त्यावर मात करून कशा रीतीने तो यशस्वी होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. स्पर्धांमधील महत्त्वाचे क्षण, खेळाडूचा सराव, महत्त्वाच्या घटना यावर दिग्दर्शकाचे विशेष लक्ष असते.
पण विचार केला तर लाखोंच्या संख्येने सिनेमा बघायला जाणारे क्रीडा प्रेमी प्रेक्षक वास्तवात होणाऱ्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तर किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा बघायला जातात काय? देशामध्ये होणाऱ्या ८०% स्पर्धांमधील प्रेक्षकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच दिसते. मग अशा सिनेमांमधून करोडो रुपये कमावले तरी खेळाडूंना त्याचा फायदा काय?
प्रत्यक्षात राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढली तर खेळाडूंचा उत्साह, इच्छाशक्ती आणि जिद्द द्विगुणित होईल. एवढंच नाही तर स्पर्धांना प्रेक्षकांची संख्या वाढली की, खेळविषयीचे सकारात्मक वातावरण बनेल, मैदाने तयार होतील, संघटनांना भेडसावणारा पैशाचा प्रश्न सुटेल, अधिक मुले खेळाकडे वळतील, खेळाचा दर्जा वाढेल.
अजून एक गोष्ट अशी की, खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळताना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न. तो म्हणजे पैसा! राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीचा खर्च खेळाडू व त्याचे पालक सुद्धा कसा बसा करू शकतील पण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेची वेळ येते तेव्हा पैशा अभावी अनेक खेळाडू मागे पाडतात व खेळापासून दुरावले जातात. जर खेळाचे प्रेक्षक वाढले तर अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी, खेळाडूंसाठी प्रायोजकत्व सुद्धा लवकर मिळेल व खेळाडू पुढील फार मोठा प्रश्न दूर होईल.
त्यासाठी स्पर्धेच्या आयोजकांनी सुद्धा जास्तीत जास्त प्रेक्षक स्पर्धा बघण्यासाठी कसे येतील यासाठी विपणानाकडे म्हणजेच जाहिरातीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. कारण आजच्या काळात न विकणारी वस्तू सुद्धा आकर्षक जाहिरातींमुळे विकल्या जातात. आणि खेळाएवढं दुसर आकर्षक काय असू शकत? गरज आहे जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचवण्याची आणि लोकांनी फक्त सिनेमागृहात खेळावर बनले जाणारे चित्रपट न पाहता प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळाचा आनंद लुटण्याची.
© रोहन व्यंकटेश श्रीरामवार, २३.०७.२०१८
Comments
Post a Comment