थोर पुरुषांची जयंती की त्यांच्या विचारांची पुण्यतिथी?





आपल्या देशामध्ये अनेक थोरपुरुष, युगपुरुष, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर, समाजसुधारक, समाजप्रबोधक होऊन गेलेत. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी, कल्याणासाठी, समाज सुधारणेसाठी, समाज प्रबोधनासाठी, देशाच्या हितासाठी, धर्म रक्षणासाठी पणाला लावले/ खर्च केले. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आहोत व त्यांच्याबद्दल वाचत आहोत.

या आपल्या सर्व थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम, समारंभ, शोभायात्रा, रॅली, मिरवणूक, दिंडी, सभा, पथनाट्य, इत्यादी आयोजित केले जातात. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यामागचे उद्दिष्ट आपल्या सर्वांना महितीतीच आहे की, सर्व थोर पुरुषांचे आपणाला पुण्यस्मरण व्हावे, त्यांनी केलेल्या कार्याची आम्हाला जाणीव असावी, त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांना आदर असावा, त्याच्या कर्तुत्वाला पाहून आम्हीसुद्धा त्यांच्याकडे असलेले चांगले गुण आत्मसात करावे आणि आम्ही सुद्धा देशाचे सृजन नागरिक व्हावे व आमच्या हातून सुद्धा समाजकार्य, देशकार्य घडावे.

सर्व थोर पुरुषांच्या कार्याचा विचार केला तर असे दिसून येते की, समकालीन समाजातील स्थितीचा त्यांनी निरिक्षणपूर्वक पूर्णपणे अभ्यास केला व ज्या गोष्टीची कमी, उणीव, त्रुटी त्यांना भासली त्या गोष्टीसाठी, त्यांनी नियोजनात्मक विचाराने कार्य केले. उदाहरण द्यायचे झाले तर, ज्यांना देशाच्या स्वातंत्र्याची उणीव भासली त्यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कार्य केले, ज्याला समाजात ज्ञानाची कमी भासली त्यांनी ज्ञान प्रबोधनाचे कार्य केले, ज्यांना समाज व्यवस्थेमध्ये कमी जाणवली त्यांनी तिला व्यवस्था लावण्याचे कार्य केले. त्यांचा उद्देश समाजाचा आर्थिक, सामाजिक व राजकीय विकास करण्याचा होता. समाजाला नियम लावण्यासाठी आधी स्वतःला नियम लावावे लागतात याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी आधी स्वतः नियम आणि शिस्त लावली आणि नंतर त्याचे पालन करण्यास सांगितले.

पण आज ज्या थोर पुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम ठेवले जातात. त्याठिकाणी आयोजक आणि श्रोता यांच्याकडे पाहता त्या थोर पुरुषांच्या विचारांचा अवलंब करताना खरच किती जण दिसतात? फक्त थोर पुरुषांचा फोटो लावून, त्यांना मोठे हार चढवून त्यांच्या नावाखाली लोकांना एकत्र करून भाषण देणे म्हणजे त्यांची जयंती करणे कितपत योग्य आहे? आणि आजकाल तर एक नवीन ट्रेंड बाजारात दिसतोय तो म्हणजे डीजे लावून मिरवणूक काढणे. काय शिकणार आहे नवीन पिढी या डीजे च्या मिरवणुकीतून? कोणाचा वाढदिवस आहे लावा डीजे, कोणाचे लग्न आहे लावा डीजे, कोणाची जयंती आहे लावा डीजे, कोणाची पुण्यतिथी आहे लावा डीजे. विज्ञानाच्या युगातील सर्व तरुण मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रत्तेक परंपरेचे वैज्ञानिक कारण विचारतात. मग या डीजे लावून नाचण्याचे कारण काय? हि आपली संस्कृती नाही. मग उगाच हा पोरखेळ कशाला? अशा वागण्याने सर्व थोर पुरुषांच्या विचारांची पुण्यतिथी होत चालली आहे.

आज सभ्यतेचे जेवढे चोचले पुरविले जात आहेत तेवढी संस्कृती टिकविण्यासाठी सुद्धा प्रयत्न झालेच पाहिजेत. नसता संस्काररहित वागण्याचे दुष्परिणाम आपण जे पाहत आहोत त्याला आटोका घालणे शक्य होणार नाही.
पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची आठवण नक्कीच केली पाहिजे पण आजही असंख्य प्रश्न आपल्यापुढे आहेत ते सोडवण्यासाठी विशेष कार्य केले पाहिजेत. थोर पुरुषांचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येते कि, बहुसंख्य थोर पुरुष स्वातंत्र्य पूर्व काळातील आहेत. त्यांनी त्या काळात भेडसावत असलेल्या प्रश्नांचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी तन, मन, धनाने त्याचप्रमाणे गरज पडली तर साम, दाम, दंड, भेद यांचा वापर केला. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आपल्या देशातील सर्वच प्रश्न सुटलेत का? नक्कीच नाही. उलट बदलत्या काळाप्रमाणे नवनवीन बदलाप्रमाणे नवीन समस्या निर्माण होत आहेत. मग स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पाहिजे तसे अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कोणी का पुढाकार घेतला नाही?

“आपल्या देशाला सध्या कशाची गरज आहे तर चारित्र्यवान तरुणांची”. जे चारित्र्यवान आहेत तेच समाज सुधारणेच्या आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करू शकतील. चारित्र्यवान पिढी तेव्हाच घडेल, जेव्हा मुलांवर लहानपणापासून चांगले संस्कार होतील. वाढत्या सभ्यातेबरोबर बाह्य प्रलोभनांना आहारी जाणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे. पण त्या सभ्यतेला अनुसरून संस्कृतीची वाढ कुठतरी थांबलेली दिसत आहे. त्यामुळे अनेक समस्या सध्या तरुण पिढीपुढे निर्माण झालेल्या आहेत. बेरोजगारी, बलात्कार, आत्महत्या, सोशल मीडियाचा अतिवापर, गैरवर्तणूक, जातीय मतभेद, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, कमी होत चाललेली माणुसकी, वाढते अपघात, इत्यादी ज्वलंत समस्या वाढत चालल्या आहेत. या सोडवण्यासाठी आपणा सर्व तरुण मंडळींनी विशेष लक्ष देऊन त्यासाठी कार्य केले पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर आपल्या देशामध्ये सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे. त्यामुळे आपल्या देशाला तरुण देश समजला जातो. सर्व प्रकारचे बदल करण्याची क्षमता आणि शक्ती या तरुण वर्गामध्ये आहे. यासाठी सर्वांनी विचारपूर्वक एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे.

खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या थोर पुरुषांची जयंती वा पुण्यतिथी साजरी करायची असेल, तर त्यासाठी सर्वांनी एक गुण आत्मसात करायला हवा. तो म्हणजे "शिस्त".

शिस्त आपल्या देशाला आपले घर समजण्याची, शिस्त आपल्या सभोवतालच्या परिसराला स्वच्छ ठेवण्याची, शिस्त कायद्याचे पालन करण्याची, शिस्त वाहतुकीचे नियम पाळण्याची, शिस्त देशाची सेवा करणाऱ्यांचा आदर करण्याची, शिस्त गुन्हेगारांना शिक्षा देण्याची, शिस्त लाचारांना, गरजूंना मदत करण्याची, शिस्त सर्व कर्मचाऱ्यांनी आपले काम चोख पार पाडण्याची, शिस्त एकोप्याने राहण्याची, शिस्त बंधुता राखण्याची आणि शेवटी शिस्त माणूस म्हणून माणुसकीने राहण्याची.


धन्यवाद!

© श्री. रोहन व्यंकटेश श्रीरामवार, ०९.०८.२०१८

Comments

Popular posts from this blog

"दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ" - तरुणांपुढील आवाहन

दुःख : एक भावना